Saturday, December 21, 2019

बांग्लादेशी घरजावई

||श्रीं||

वकिलीच्या सुरवतीच्या काळात मी ज्यांच्याकडे शिकत होतो त्यांच्या कडे एक केस आली होती. आमची अशील एक २१ वर्षांची मुस्लिम बाई होती. तिची सगळी हकीकत सांगून झाल्यावर खात्री साठी मी तिला काही प्रश्न विचारले. आणि त्यात पडताळणी वेळी ती केस माझ्याकडे आली. नेहमी प्रमाणे न्यायालयाच्या पडताळणी आधी मी कार्यालयात पडताळणी केली; त्यात जे समोर आले ते धक्कादायक होते. खरं तर मुलीच्या आईने मुलीला नवरा बघताना गरजवंत मुलगा बघून घरजावई करुन घेतला होता. त्याला एक खोली नावावर करुन दिली होती. पण काही दिवसांनी त्याचे अंदाज बिघडले... त्याने आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली ..
दुर्दैवाने ही गोष्ट न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात नमूद केली नव्हती..
पण साक्ष सुरु असताना ही बाब महत्वाची असूनही न्यायालयाने केवळ मूळ अर्जात आहे तितकाच मजकूर  रेकॉर्ड वर घेता येईल असे सांगून ही बाब टाळली.
नंतर सरकारी वकिकीलांशी ह्या विषयावर बोलल्यावर लक्षात आले की, कायद्या प्रमाणे आपण ह्यांना पकडले तरी तो बांग्लादेशी नागरिक आहे हे सरकारला सिद्ध करावे लागेल. त्यामुळे त्याने आल्या आल्या आपली जुनी कागदपत्रे नष्ट केलेली असतात त्यामुळे त्यांना सिद्ध करणे शक्य होत नाही ..
सगळ्या यंत्रणांना उगाच काम लागते म्हणून हे टाळतात ..
आताच्या दुरुस्तीमुळे नागरिकाला साबीत करावे लागत असल्याने बांग्लादेशी घरजावयांची ही सगळी बोंबाबोंब झाली आहे ..
त्यामुळे इथल्या जावयांनी घाबरायचे कारण नाही ..



Wednesday, December 18, 2019

खरं सांगतो बाळासाहेब आज तुम्ही हवे होतात ..

खरं सांगतो बाळासाहेब
आज तुम्ही हवे होतात ..

तुमची असलेली बिरुदावली
आम्ही आमचीच समजत होतो
सेना आमचीच सेनापती
तुम्हां शिवाय मानत नव्हतो ..
हिंदू मनाचा सम्राट जेव्हा
चवी पुरते वंदनीय होतात ..
खरं सांगतो बाळासाहेब
आज तुम्ही हवे होतात ..

ते ही आम्ही सहन केले
हे ही आम्ही सहन करु ?
स्वातंत्र्यसूर्यावर थुंकेल पप्पू
आम्ही त्याची पिंक धरू?
गांडु की मर्द म्हणून ..
जगा, असे बोलला होतात
खरं सांगतो बाळासाहेब
आज तुम्ही हवे होतात ..

चला नवा संसार आहे ..
ते ही आम्ही समजून घेऊ
दुधा सोबत शेळीच्या
दोन लेंडया ही पिऊन घेऊ ..
दगडाखाली हात जयाचा
त्याची वाचा तुम्हीच होतात..
खरं सांगतो बाळासाहेब
आज तुम्ही हवे होतात ..

जमिया आणि जालियनवाला
तुलना करावी कुणी कशी ?
काय बोलतील ? अमर हुतात्मे
जरी भेटतील स्वर्गासी ..
इतिहासाचा पाठ नवा
इटली छाप करु म्हणतात ..
खरं सांगतो बाळासाहेब
आज तुम्ही हवे होतात ..

आजूनही वेळ गेली नाही
मान्य ही सर्व समीकरणे
तरीही योग्य वेळी बोलावे
नाहीतर मौन बरे धरणे
खूप आहे लिहाण्या सारखे
गुज जाणणारे तुम्हीच होतात ..
खरं सांगतो बाळासाहेब
आज तुम्ही हवे होतात ..

अधिवक्ता चेतन विश्वनाथ बारस्कर
१८/१२/२०१९ 

Thursday, December 12, 2019

||श्रीं||
         
अग्नीमाजीं गेलें। तें अग्निरुप होऊनि ठेलें।।
काय उरलें तयां पण। मागील तें नामगुण।।
सरिता ओढा ओहोळा। गंगे मिळोनि झाल्या गंगा।।
चंदनाचे वासें। तरु चंदन झाले स्पर्शे।।
लोह जडतां परिसा अंगीं। तो ही भूषण झाला जगीं।।
तुका जडला संतांपायी। दुजेपणा ठाव नाही।।

जे आगीत जातं ते पेटून अग्नी रुपंच होऊन जातं, त्याचे मागचे गुणधर्म नावाला सुद्धा शिल्लक राहत नाहीत. मोठी नदी असो, एखादा ओढा अथवा ओहोळ असो ते जर का गंगेस मिळाले की त्याचे नदीपण, ओढा अथवा ओहळ पण शिल्लक राहत नाही ते गंगाच होऊन जातात. चंदनाचा सुवास ज्या झाडा सोबत वाढते त्या झाडाला ही लागते.  लोखंड परिसाचा क्षणार्धाचा स्पर्श लोखंडाचे मोल बदलून टाकते. त्याच प्रमाणे संताच्या पायी लागल्यावर सुद्धा संतत्व प्राप्त करुन देण्याची किमया होते असे तुकोबा सांगतात ..  

त्याच प्रमाणे श्री शिव प्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या उपक्रमात सहभागी झाल्यावर श्री शिव-शंभू छत्रपतींच्या अंत:करणाचा ठाव आपल्याला कळतो. मात्र त्यातील विशेषार्थाने मोहीम हा उपक्रम इतका विशेष आहे की वर्षभर आपण केलेले उपक्रम म्हणजे शाळेत/महाविद्यालयात रोज दिलेली उपस्थिती व मोहिम म्हणजे वार्षिक परीक्षा. वार्षिक परीक्षेत न बसता; वर्षभर वर्गात बसला म्हणून कोणी उत्तीर्ण करत नाही. परंतु काही अपरिहार्य कारणाने वर्गात बसू न शकलेला विद्यार्थी पण वार्षिक परीक्षेत बसून उत्तीर्ण होऊ शकतो.  

त्याच प्रमाणे श्री शिव-शंभूंच्या विचारांचे पाईक होण्याची पात्रता आपल्यात आहे का नाही ? हे तपासणी केंद्र म्हणजे मोहीम.

ह्यात उत्तीर्ण झालो म्हणजे पात्रता आपल्यात आहे. आहोत की नाही हे पुढच्या वर्षभरात आपण जगून दाखवायचं असतं. 

आज श्री शिव शंभूंच्या नावाने संघटनात्मक काम करणाऱ्या अनेक संस्था संघटना उत्तम सामाजिक व संघटनात्मक कार्य करत आहेत व ह्या महाराष्ट्रात दिवसा गणिक नव्याने ही उघडत असतात. पण श्री शिव शंभू हे सामाजिक विषय नसून वैयक्तिक आचरणाचे मानबिंदू आहेत. तसे आपण जगले-वागले पाहिजेत असे सांगणारी श्री शिव प्रतिष्ठान, हिंदुस्थान ही एकमेव संघटना आहे. आणि आपल्या भाग्याने ज्यांच्या मार्गदर्शना खाली आपण चालतो ते गुरुजी हे तसे जीवन जगून आपल्या समोर असलेले जिवंत आदर्श आहेत. नाहीतर रोज सूर्यनमस्कार घाला असे सांगणारे अनेक ढालगंज किंवा बुळबुळीत दंडाचे गुरु आपण बघतोच.

म्हणून आपण विशेष भाग्यवान आहोत. ना कोणाचा द्वेष; ना राग; केवळ आग्रह; आपण हिंदू म्हणून असण्याचा ...!
हिंदू म्हणून जगण्याचा..!

Tuesday, December 10, 2019

गोवारीकरांचे पानिपत आणि चांदोबा

गोवारीकरांचे पानिपत आणि चांदोबा

         खरं म्हणजे सध्या इतिहास पटांच्या दर्जा मुळे जावं की नाही ह्या दुविधेत असताना बायकोला दाखवायचा म्हणून गेलो .. 
        आणि बायकोला चित्रपटाला घेऊन गेलो की पहिले काय होतं ? तर तो उशीर. तो व्हायचा तोच झाला त्यामुळे उदगीरच्या लढाई नंतर मी पोहचलो .. 
            शेवटून दुसऱ्या रांगेत असल्याने सगळी गर्दी बघत बघत गेलो तरी त्यात बहुतांश बिगर महाराष्ट्रीय होती. आमच्या बाजूला एक बाप आपल्या मुलीला घेऊन आला होता. ती मुलगी मधून मधून ज्या प्रकारे बापाला प्रश्न विचारत होती त्यात खरी गंमत होती. 
             इतिहास अभ्यासकच काय ? पण माझ्या सारखा अतिसमान्य इतिहासाचा विद्यार्थी ही अनेक चुका त्यातून काढू शकतो..  
                   पण तूर्तास त्या बाजूला ठेऊयात.. 
            ह्याला एक कारण आहे; कारण पैसे कमावणे हा विषय सोडल्यास ह्या चित्रपटातून दिग्दर्शकाला एकच गोष्ट सांगायची आहे असे प्रकर्षाने जाणवते; ती म्हणजे "देव-देश-धर्मासाठी अखंड हिंदुस्थानचा विचार करणारी एकच जात आहे ती म्हणजे "मराठा" (मराठा तितुका मेळवावा वाला)."
     
            ह्या चित्रपटातील मला सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे दोन पताकांचा भगवा ध्वज आणि ज्यावेळी सदाशिवराव भाऊ दिल्लीच्या त्या मग्रूर मयूरासना समोर जातात त्यावेळी एक उत्सवाच नाच-गाण दाखवले आहे. ते १००% मराठ्यांनी तसे नाचले असतील असे मला वाटत नाही पण त्यांची मनं मात्र नक्कीच नाचली असतील. तर.. त्या गाण्यात जाणीव पूर्वक एक गोष्ट दाखवलीये ज्या मुळे त्यांच्या १०० चुका पोटात घ्यायला मला काहीही वाटणार नाही; ते म्हणजे... 
            ज्या ठिकाणी त्या दरबारात श्री शिवप्रभू उभे राहिले असतील ती जागा कल्पून तिथे रांगोळी काढून तिथे त्यांची आठवण म्हणून जिरेटोप व तलवार पार्वतीबाई पूजतात. हे चित्रीकरण बघताना टचकन डोळ्यात पाणी येऊन जाते आणि गुरुजींच्या एका वाक्याची आठवण येते, "ते दिल्लीचे तख्त फोडणारे हात जरी भाऊचे असतील तरी; त्या मनगटा मागची प्रेरणा श्री शिवछत्रपतीच आहेत; भाऊंचे ते रूप म्हणजे श्री शिवछत्रपतींचे प्रखर रूप आहे.. (म्हणजेच विभूति योग आहे.) "
                मराठीत सिनेमॅटिक लिबर्टी की काय म्हणतात त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. 
ह्या अशा गोष्टी हिन्दी चित्रपट सृष्टीत सहसा दाखवल्या गेल्या नाहीत .. ते ह्यांनी दाखवलं ह्याचं कौतुक आहेच .. 

                 हा मुळात सर्वसामान्य व्यक्तींसाठीचा चित्रपट आहे..  
                ज्यांना पानिपताच्या तपशीलापेक्षा पानिपताचा उद्देश समजून घेण्यात रस आहे त्यांच्यासाठी हा चित्रपट आहे.. माझ्या ह्या म्हणण्या वर अनेक इतिहासप्रेमी व आक्षेप घेऊ शकतात .. पण एक उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल .. 
              वाल्मिकी रामायणात सीता स्वयंवर, लक्ष्मण रेखा, राम नामाने तरंगणारी दगडे इत्यादी गोष्टी नाही आहेत.. पण तुलसी रामायणात आहेत, आणि त्याच गोष्टी अधिक प्रचलित आहेत ..  पण त्यातून सामान्य माणसांचे काही नुकसान नाही आहे झालीच तर श्रद्धा वाढवणे इतकांच त्या बाबतचा हेतु आहे.. त्यामुळे ते क्षम्य आहे .. 

         आणि गंमत सांगू का ? खर म्हणजे संहित्यातल्या अंधश्रद्धा दूर करायच्या असतील तर पहिले बडबडगीतांवर बंदी आणायला लागेल .. कारण चंद्र हा तुमचा मामा नसून पृथ्वीचा एक उपग्रह आहे आणि त्यावर खड्डे आहेत, त्याला पृथ्वी व स्वत:भोवती फिरायला २७ दिवस लागतात हे कोणी आमच्या  "ध्रुवराज" ला सांगितले तर हातात असेल ते त्याच्या डोक्यात घालायला कमी करणार नाही .. आणि तो ते करण्या आधी मीच ते करीन. कारण "चांदोमामा" आकशात पाहिल्या नंतर त्याच्या तो ज्या आनंदाने व उत्साहाने तोंडावर हात ठेऊन आनंदित होतो ! त्या समोर सारं शहाणपण ओवाळून टाकावसं वाटतं .. 

               पण आज तपशीलांच्या तापलेल्या तव्यावर आपल्याला केवळ दिसणाऱ्या व आनंदा (तो ही तुमच्या मनात असेल तर) शिवाय काहीही न देणाऱ्या कोणाशी ही नातं जोडण्याची सवय लाऊन पुष्ट होणारे भावविश्व करपवणे हे मला तरी जमणार नाही..
               भविष्यात तो त्याच्या कुवती नुसार चंद्र शिकेल, चंद्र ग्रहण ही शिकेल इतकेच काय चांद्र मोहिमही करेल .. त्याच प्रमाणे आज गोवारीकरांचा पानिपत बघणारे उद्या विश्वास पाटील, शेवडे गुरुजी, कुलकर्णी, यांची पुस्तके वाचण्यास उद्युक्त होतील .. 
              त्याही पुढे जाऊन आपापल्या कुवती प्रमाणे हे ज्यांच्या प्रेरणा प्रकाशातून घडले त्या शिवप्रभूं पर्यंत पोहचतील.. त्यातील काही जण आजून पुढे जाऊन भारतभूच्या एकता व एकात्मता अखंड ठेवण्यास उद्युक्त होतील .. 

               पण तो पर्यंत आजतागायत श्री शिवप्रभूंच्या स्फूर्ति प्रेरणेतून उभे राहिलेले हजारो चांदोबा आम्हाला नव्या पिढीला हवेत .. फक्त त्यातील हेतु शुद्ध व अंतकरण श्रद्धायुक्त हवे .. नाहीतर "बजने दे धडक धडक" करणारे नालायक "संज्याचे बाजीराव" आहेतच ..
त्या पेक्षा हा गोवारीकरांच्या पानिपताचा चांदोबा हा उजवा म्हणावा लागेल .. 

Saturday, December 7, 2019

श्रीमत् भगवत् गीता व श्री शिवछत्रपती संबंध

आज गीता जयंती,

आजच्याच दिवशी भगवंतांनी पूर्ण मानव जातीला मार्गदर्शन करणारी श्रीमत् भगवत् गीता कुरुक्षेत्रच्या रणमैदानावर सांगितली ....
प्रबोधनकार काय म्हणतायेत ते पाहूयात गीता-छत्रपती श्री शिवाजीमहाराज ह्यांच्या संबंधांवर ....

"हिंदवी स्वराज्याच्या प्राणप्रतिष्ठेसाठी स्वतःचा प्राण देणे अथवा अफझुलखानाचा प्राण घेणे, यापेक्षा तिसरा मार्गच शिवाजीपुढे नव्हता. अर्थात ते कर्तव्य त्याने मोठ्या कुशलतेने पार पाडून, `योगः कर्मसुकौशलम्’ या गीतोक्तीप्रमाणे राजकारणी दगलबाजांतील योगीराज ही आपली कीर्ती जगजाहीर केली. श्रीकृष्णाने गीता सांगितली अर्जुनाला, पण ती प्रत्यक्ष आचरणात आणून महाराष्ट्राचा राष्ट्रधर्म भगवद्गीतेत आहे, हे सप्रमाण सिद्ध केले शिवाजीने. गीतेचे पांग पांडवांनी फेडले नाहीत, ते शिवाजीने फेडले. महाभारतीय इतिहासाला आपल्या बुद्धिप्रभावाने रंगवून चिरंजीव करणा-या दगलबाज श्रीकृष्णाला अर्जुनापेक्षा दगलबाज शिवाजी हाच खरा शिष्य व अनुयायी लाभला, यांत मुळीच संशय नाही. अर्थात
``यत्न योगेश्वर: कृष्णः’’ हा श्लोक या पुढे –
यत्र योगेश्वर: कृष्णो यत्र शिवराय भूपति ।।
तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ।।
असाच वाचला पाहिजे, बोला – दगलबाज शिवाजीचा जयजयकार!!
प्रबोधनकार ठाकरे
--- दगलबाज शिवाजी
--- पान क्र.१३

चला आपणही श्रीमत् भगवत् गीता व श्री शिवप्रभूंच्या मार्गाचे अनुनयन करण्याचा संकल्प श्री गीताजयंतीच्या दिवशी घेऊयात ....