Saturday, December 21, 2019

बांग्लादेशी घरजावई

||श्रीं||

वकिलीच्या सुरवतीच्या काळात मी ज्यांच्याकडे शिकत होतो त्यांच्या कडे एक केस आली होती. आमची अशील एक २१ वर्षांची मुस्लिम बाई होती. तिची सगळी हकीकत सांगून झाल्यावर खात्री साठी मी तिला काही प्रश्न विचारले. आणि त्यात पडताळणी वेळी ती केस माझ्याकडे आली. नेहमी प्रमाणे न्यायालयाच्या पडताळणी आधी मी कार्यालयात पडताळणी केली; त्यात जे समोर आले ते धक्कादायक होते. खरं तर मुलीच्या आईने मुलीला नवरा बघताना गरजवंत मुलगा बघून घरजावई करुन घेतला होता. त्याला एक खोली नावावर करुन दिली होती. पण काही दिवसांनी त्याचे अंदाज बिघडले... त्याने आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली ..
दुर्दैवाने ही गोष्ट न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात नमूद केली नव्हती..
पण साक्ष सुरु असताना ही बाब महत्वाची असूनही न्यायालयाने केवळ मूळ अर्जात आहे तितकाच मजकूर  रेकॉर्ड वर घेता येईल असे सांगून ही बाब टाळली.
नंतर सरकारी वकिकीलांशी ह्या विषयावर बोलल्यावर लक्षात आले की, कायद्या प्रमाणे आपण ह्यांना पकडले तरी तो बांग्लादेशी नागरिक आहे हे सरकारला सिद्ध करावे लागेल. त्यामुळे त्याने आल्या आल्या आपली जुनी कागदपत्रे नष्ट केलेली असतात त्यामुळे त्यांना सिद्ध करणे शक्य होत नाही ..
सगळ्या यंत्रणांना उगाच काम लागते म्हणून हे टाळतात ..
आताच्या दुरुस्तीमुळे नागरिकाला साबीत करावे लागत असल्याने बांग्लादेशी घरजावयांची ही सगळी बोंबाबोंब झाली आहे ..
त्यामुळे इथल्या जावयांनी घाबरायचे कारण नाही ..



Wednesday, December 18, 2019

खरं सांगतो बाळासाहेब आज तुम्ही हवे होतात ..

खरं सांगतो बाळासाहेब
आज तुम्ही हवे होतात ..

तुमची असलेली बिरुदावली
आम्ही आमचीच समजत होतो
सेना आमचीच सेनापती
तुम्हां शिवाय मानत नव्हतो ..
हिंदू मनाचा सम्राट जेव्हा
चवी पुरते वंदनीय होतात ..
खरं सांगतो बाळासाहेब
आज तुम्ही हवे होतात ..

ते ही आम्ही सहन केले
हे ही आम्ही सहन करु ?
स्वातंत्र्यसूर्यावर थुंकेल पप्पू
आम्ही त्याची पिंक धरू?
गांडु की मर्द म्हणून ..
जगा, असे बोलला होतात
खरं सांगतो बाळासाहेब
आज तुम्ही हवे होतात ..

चला नवा संसार आहे ..
ते ही आम्ही समजून घेऊ
दुधा सोबत शेळीच्या
दोन लेंडया ही पिऊन घेऊ ..
दगडाखाली हात जयाचा
त्याची वाचा तुम्हीच होतात..
खरं सांगतो बाळासाहेब
आज तुम्ही हवे होतात ..

जमिया आणि जालियनवाला
तुलना करावी कुणी कशी ?
काय बोलतील ? अमर हुतात्मे
जरी भेटतील स्वर्गासी ..
इतिहासाचा पाठ नवा
इटली छाप करु म्हणतात ..
खरं सांगतो बाळासाहेब
आज तुम्ही हवे होतात ..

आजूनही वेळ गेली नाही
मान्य ही सर्व समीकरणे
तरीही योग्य वेळी बोलावे
नाहीतर मौन बरे धरणे
खूप आहे लिहाण्या सारखे
गुज जाणणारे तुम्हीच होतात ..
खरं सांगतो बाळासाहेब
आज तुम्ही हवे होतात ..

अधिवक्ता चेतन विश्वनाथ बारस्कर
१८/१२/२०१९ 

Thursday, December 12, 2019

||श्रीं||
         
अग्नीमाजीं गेलें। तें अग्निरुप होऊनि ठेलें।।
काय उरलें तयां पण। मागील तें नामगुण।।
सरिता ओढा ओहोळा। गंगे मिळोनि झाल्या गंगा।।
चंदनाचे वासें। तरु चंदन झाले स्पर्शे।।
लोह जडतां परिसा अंगीं। तो ही भूषण झाला जगीं।।
तुका जडला संतांपायी। दुजेपणा ठाव नाही।।

जे आगीत जातं ते पेटून अग्नी रुपंच होऊन जातं, त्याचे मागचे गुणधर्म नावाला सुद्धा शिल्लक राहत नाहीत. मोठी नदी असो, एखादा ओढा अथवा ओहोळ असो ते जर का गंगेस मिळाले की त्याचे नदीपण, ओढा अथवा ओहळ पण शिल्लक राहत नाही ते गंगाच होऊन जातात. चंदनाचा सुवास ज्या झाडा सोबत वाढते त्या झाडाला ही लागते.  लोखंड परिसाचा क्षणार्धाचा स्पर्श लोखंडाचे मोल बदलून टाकते. त्याच प्रमाणे संताच्या पायी लागल्यावर सुद्धा संतत्व प्राप्त करुन देण्याची किमया होते असे तुकोबा सांगतात ..  

त्याच प्रमाणे श्री शिव प्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या उपक्रमात सहभागी झाल्यावर श्री शिव-शंभू छत्रपतींच्या अंत:करणाचा ठाव आपल्याला कळतो. मात्र त्यातील विशेषार्थाने मोहीम हा उपक्रम इतका विशेष आहे की वर्षभर आपण केलेले उपक्रम म्हणजे शाळेत/महाविद्यालयात रोज दिलेली उपस्थिती व मोहिम म्हणजे वार्षिक परीक्षा. वार्षिक परीक्षेत न बसता; वर्षभर वर्गात बसला म्हणून कोणी उत्तीर्ण करत नाही. परंतु काही अपरिहार्य कारणाने वर्गात बसू न शकलेला विद्यार्थी पण वार्षिक परीक्षेत बसून उत्तीर्ण होऊ शकतो.  

त्याच प्रमाणे श्री शिव-शंभूंच्या विचारांचे पाईक होण्याची पात्रता आपल्यात आहे का नाही ? हे तपासणी केंद्र म्हणजे मोहीम.

ह्यात उत्तीर्ण झालो म्हणजे पात्रता आपल्यात आहे. आहोत की नाही हे पुढच्या वर्षभरात आपण जगून दाखवायचं असतं. 

आज श्री शिव शंभूंच्या नावाने संघटनात्मक काम करणाऱ्या अनेक संस्था संघटना उत्तम सामाजिक व संघटनात्मक कार्य करत आहेत व ह्या महाराष्ट्रात दिवसा गणिक नव्याने ही उघडत असतात. पण श्री शिव शंभू हे सामाजिक विषय नसून वैयक्तिक आचरणाचे मानबिंदू आहेत. तसे आपण जगले-वागले पाहिजेत असे सांगणारी श्री शिव प्रतिष्ठान, हिंदुस्थान ही एकमेव संघटना आहे. आणि आपल्या भाग्याने ज्यांच्या मार्गदर्शना खाली आपण चालतो ते गुरुजी हे तसे जीवन जगून आपल्या समोर असलेले जिवंत आदर्श आहेत. नाहीतर रोज सूर्यनमस्कार घाला असे सांगणारे अनेक ढालगंज किंवा बुळबुळीत दंडाचे गुरु आपण बघतोच.

म्हणून आपण विशेष भाग्यवान आहोत. ना कोणाचा द्वेष; ना राग; केवळ आग्रह; आपण हिंदू म्हणून असण्याचा ...!
हिंदू म्हणून जगण्याचा..!

Tuesday, December 10, 2019

गोवारीकरांचे पानिपत आणि चांदोबा

गोवारीकरांचे पानिपत आणि चांदोबा

         खरं म्हणजे सध्या इतिहास पटांच्या दर्जा मुळे जावं की नाही ह्या दुविधेत असताना बायकोला दाखवायचा म्हणून गेलो .. 
        आणि बायकोला चित्रपटाला घेऊन गेलो की पहिले काय होतं ? तर तो उशीर. तो व्हायचा तोच झाला त्यामुळे उदगीरच्या लढाई नंतर मी पोहचलो .. 
            शेवटून दुसऱ्या रांगेत असल्याने सगळी गर्दी बघत बघत गेलो तरी त्यात बहुतांश बिगर महाराष्ट्रीय होती. आमच्या बाजूला एक बाप आपल्या मुलीला घेऊन आला होता. ती मुलगी मधून मधून ज्या प्रकारे बापाला प्रश्न विचारत होती त्यात खरी गंमत होती. 
             इतिहास अभ्यासकच काय ? पण माझ्या सारखा अतिसमान्य इतिहासाचा विद्यार्थी ही अनेक चुका त्यातून काढू शकतो..  
                   पण तूर्तास त्या बाजूला ठेऊयात.. 
            ह्याला एक कारण आहे; कारण पैसे कमावणे हा विषय सोडल्यास ह्या चित्रपटातून दिग्दर्शकाला एकच गोष्ट सांगायची आहे असे प्रकर्षाने जाणवते; ती म्हणजे "देव-देश-धर्मासाठी अखंड हिंदुस्थानचा विचार करणारी एकच जात आहे ती म्हणजे "मराठा" (मराठा तितुका मेळवावा वाला)."
     
            ह्या चित्रपटातील मला सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे दोन पताकांचा भगवा ध्वज आणि ज्यावेळी सदाशिवराव भाऊ दिल्लीच्या त्या मग्रूर मयूरासना समोर जातात त्यावेळी एक उत्सवाच नाच-गाण दाखवले आहे. ते १००% मराठ्यांनी तसे नाचले असतील असे मला वाटत नाही पण त्यांची मनं मात्र नक्कीच नाचली असतील. तर.. त्या गाण्यात जाणीव पूर्वक एक गोष्ट दाखवलीये ज्या मुळे त्यांच्या १०० चुका पोटात घ्यायला मला काहीही वाटणार नाही; ते म्हणजे... 
            ज्या ठिकाणी त्या दरबारात श्री शिवप्रभू उभे राहिले असतील ती जागा कल्पून तिथे रांगोळी काढून तिथे त्यांची आठवण म्हणून जिरेटोप व तलवार पार्वतीबाई पूजतात. हे चित्रीकरण बघताना टचकन डोळ्यात पाणी येऊन जाते आणि गुरुजींच्या एका वाक्याची आठवण येते, "ते दिल्लीचे तख्त फोडणारे हात जरी भाऊचे असतील तरी; त्या मनगटा मागची प्रेरणा श्री शिवछत्रपतीच आहेत; भाऊंचे ते रूप म्हणजे श्री शिवछत्रपतींचे प्रखर रूप आहे.. (म्हणजेच विभूति योग आहे.) "
                मराठीत सिनेमॅटिक लिबर्टी की काय म्हणतात त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. 
ह्या अशा गोष्टी हिन्दी चित्रपट सृष्टीत सहसा दाखवल्या गेल्या नाहीत .. ते ह्यांनी दाखवलं ह्याचं कौतुक आहेच .. 

                 हा मुळात सर्वसामान्य व्यक्तींसाठीचा चित्रपट आहे..  
                ज्यांना पानिपताच्या तपशीलापेक्षा पानिपताचा उद्देश समजून घेण्यात रस आहे त्यांच्यासाठी हा चित्रपट आहे.. माझ्या ह्या म्हणण्या वर अनेक इतिहासप्रेमी व आक्षेप घेऊ शकतात .. पण एक उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल .. 
              वाल्मिकी रामायणात सीता स्वयंवर, लक्ष्मण रेखा, राम नामाने तरंगणारी दगडे इत्यादी गोष्टी नाही आहेत.. पण तुलसी रामायणात आहेत, आणि त्याच गोष्टी अधिक प्रचलित आहेत ..  पण त्यातून सामान्य माणसांचे काही नुकसान नाही आहे झालीच तर श्रद्धा वाढवणे इतकांच त्या बाबतचा हेतु आहे.. त्यामुळे ते क्षम्य आहे .. 

         आणि गंमत सांगू का ? खर म्हणजे संहित्यातल्या अंधश्रद्धा दूर करायच्या असतील तर पहिले बडबडगीतांवर बंदी आणायला लागेल .. कारण चंद्र हा तुमचा मामा नसून पृथ्वीचा एक उपग्रह आहे आणि त्यावर खड्डे आहेत, त्याला पृथ्वी व स्वत:भोवती फिरायला २७ दिवस लागतात हे कोणी आमच्या  "ध्रुवराज" ला सांगितले तर हातात असेल ते त्याच्या डोक्यात घालायला कमी करणार नाही .. आणि तो ते करण्या आधी मीच ते करीन. कारण "चांदोमामा" आकशात पाहिल्या नंतर त्याच्या तो ज्या आनंदाने व उत्साहाने तोंडावर हात ठेऊन आनंदित होतो ! त्या समोर सारं शहाणपण ओवाळून टाकावसं वाटतं .. 

               पण आज तपशीलांच्या तापलेल्या तव्यावर आपल्याला केवळ दिसणाऱ्या व आनंदा (तो ही तुमच्या मनात असेल तर) शिवाय काहीही न देणाऱ्या कोणाशी ही नातं जोडण्याची सवय लाऊन पुष्ट होणारे भावविश्व करपवणे हे मला तरी जमणार नाही..
               भविष्यात तो त्याच्या कुवती नुसार चंद्र शिकेल, चंद्र ग्रहण ही शिकेल इतकेच काय चांद्र मोहिमही करेल .. त्याच प्रमाणे आज गोवारीकरांचा पानिपत बघणारे उद्या विश्वास पाटील, शेवडे गुरुजी, कुलकर्णी, यांची पुस्तके वाचण्यास उद्युक्त होतील .. 
              त्याही पुढे जाऊन आपापल्या कुवती प्रमाणे हे ज्यांच्या प्रेरणा प्रकाशातून घडले त्या शिवप्रभूं पर्यंत पोहचतील.. त्यातील काही जण आजून पुढे जाऊन भारतभूच्या एकता व एकात्मता अखंड ठेवण्यास उद्युक्त होतील .. 

               पण तो पर्यंत आजतागायत श्री शिवप्रभूंच्या स्फूर्ति प्रेरणेतून उभे राहिलेले हजारो चांदोबा आम्हाला नव्या पिढीला हवेत .. फक्त त्यातील हेतु शुद्ध व अंतकरण श्रद्धायुक्त हवे .. नाहीतर "बजने दे धडक धडक" करणारे नालायक "संज्याचे बाजीराव" आहेतच ..
त्या पेक्षा हा गोवारीकरांच्या पानिपताचा चांदोबा हा उजवा म्हणावा लागेल .. 

Saturday, December 7, 2019

श्रीमत् भगवत् गीता व श्री शिवछत्रपती संबंध

आज गीता जयंती,

आजच्याच दिवशी भगवंतांनी पूर्ण मानव जातीला मार्गदर्शन करणारी श्रीमत् भगवत् गीता कुरुक्षेत्रच्या रणमैदानावर सांगितली ....
प्रबोधनकार काय म्हणतायेत ते पाहूयात गीता-छत्रपती श्री शिवाजीमहाराज ह्यांच्या संबंधांवर ....

"हिंदवी स्वराज्याच्या प्राणप्रतिष्ठेसाठी स्वतःचा प्राण देणे अथवा अफझुलखानाचा प्राण घेणे, यापेक्षा तिसरा मार्गच शिवाजीपुढे नव्हता. अर्थात ते कर्तव्य त्याने मोठ्या कुशलतेने पार पाडून, `योगः कर्मसुकौशलम्’ या गीतोक्तीप्रमाणे राजकारणी दगलबाजांतील योगीराज ही आपली कीर्ती जगजाहीर केली. श्रीकृष्णाने गीता सांगितली अर्जुनाला, पण ती प्रत्यक्ष आचरणात आणून महाराष्ट्राचा राष्ट्रधर्म भगवद्गीतेत आहे, हे सप्रमाण सिद्ध केले शिवाजीने. गीतेचे पांग पांडवांनी फेडले नाहीत, ते शिवाजीने फेडले. महाभारतीय इतिहासाला आपल्या बुद्धिप्रभावाने रंगवून चिरंजीव करणा-या दगलबाज श्रीकृष्णाला अर्जुनापेक्षा दगलबाज शिवाजी हाच खरा शिष्य व अनुयायी लाभला, यांत मुळीच संशय नाही. अर्थात
``यत्न योगेश्वर: कृष्णः’’ हा श्लोक या पुढे –
यत्र योगेश्वर: कृष्णो यत्र शिवराय भूपति ।।
तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ।।
असाच वाचला पाहिजे, बोला – दगलबाज शिवाजीचा जयजयकार!!
प्रबोधनकार ठाकरे
--- दगलबाज शिवाजी
--- पान क्र.१३

चला आपणही श्रीमत् भगवत् गीता व श्री शिवप्रभूंच्या मार्गाचे अनुनयन करण्याचा संकल्प श्री गीताजयंतीच्या दिवशी घेऊयात ....

Friday, September 13, 2019

माझं जंगल ..

 ||ह्रीं||


खरं म्हणजे मी माझ्या आवाक्या बाहेरील गोष्टींवर फार जास्त विचार करत नाही. आणि आवाक्यात असलेली गोष्ट बदलल्या शिवाय राहत ही नाही. पण गेल्या काही दिवसां पासून (आरे व अमेझोन प्रकरण झाल्या पासून) एक गोष्ट सतत मनात येतेय ती म्हणजे अशी की, मुंबई जवळ आपलं स्वतःच सदाहरित जंगल असावं.. 

माझं जंगल .. 

कधी तरी गाडी काढून एकांतात जावं.. 
पाखरांची किलबिल ऐकावी .. 
एखाद्या खोपटात शिरून झुणका भाकरी खावी .. 
खरं मिनरल पाणी प्यावं .. 
आणि झाडाखाली ताणून द्यावं .. 

पण हे उभं करायला १० वर्ष ताप असतो .. नंतर पुढे त्याचं ते वाढतं .. 
व त्याच्या व्यवस्थापन व व्यवस्थेचं नियोजन त्याचं तेच करत .. 

जागा जरी फुकट मिळाली तरी सुद्धा प्रति वर्षी साधारणत: ५ रु./चौ.फु. इतका खर्च येतो. 

प्रत्येक वर्षांची रक्कम त्या वर्षी जमा करायचं म्हंटल तर त्याचा व्यवस्थापन खर्च अधिक होतो. १० वर्षांचा खर्च हा एकत्र घेतला तरच  महागाईचा दर व इतर संलग्न कामं करुन जुळणा करता येऊ शकेल.. 

तरी ज्या पर्यावरण प्रेमींना माझ्या सारखेच आपलं जंगल असावं असं वाटत त्यांनी नक्कीच ह्या चळवळीत सहभाग घ्यावा ... 

जंगल आपलंच असेल .. 
पण आपण राखलं तर .. 

कदाचित माझी हीच खरी पुढच्या पिढीला दिलेली शिदोरी असेल ... 
व वाट ही असेल पितृऋणातून मुक्त होण्याची .. 

सहभागा साठी पुढील लिंक वर आपली पूर्ण माहिती भरा .. 

ऍड. चेतन विश्वनाथ बारस्कर 
९८३३९९९११४

लिंक :- 
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfPvV1gP8quxwYz90IKVWdCfuWU9SYs5J787S2_L9biVsglrw/viewform


(दिलेल्या ईमेल वर प्रत्येक ३ महिन्यांनी तपशीलवार अहवाल पाठवला जाईल)

Thursday, September 12, 2019

||ह्रीं||

काय संबंध आहे अवकाश यान व भारतीय कलागणणेचा ..?
खरंच एकादशी व अंतराळ मोहिमेचा काही संबंध आहे का.. ?
काय आहे वैज्ञानिकांनी स्थापित केलेले ऐतिहासिक सत्य .. ?

दुसऱ्या महायुद्धा नंतर मित्र राष्ट्रांपैकी अमेरिका व सोव्हिएत रशिया ह्यांच्यात शीत युद्ध सुरु झाले. समाजवादी व भांडवलशाही राष्ट्र ह्यात अवघे विश्व वाटले जाते की काय ? अशी परिस्थिति होती. वेगवेगळ्या राष्ट्रांना आपल्या बाजूला करण्या पासून ते आर्थिक व राजकीय सत्तान्तरणे घडवून आणणे येथे सुरु झालेले हे युद्ध शस्त्रास्त्र संशोधना पासून अवकाश संशोधना पर्यन्त आले ..



१९५१ साली अमेरिकेने एरोबी रॉकेटात एक माकड व अकरा उंदीर सु. ७२ किमी. उंचीपर्यंत यशस्वी रीतीने पाठविले होते. त्यानंतर येणाऱ्या आंतरराष्ट्रीय भूभौतिकीय  वर्षातील अध्ययनात वापरण्यासाठी कृत्रिम उपग्रह तयार करण्याचा प्रकल्प १९५५ साली तयार करण्यात आला. 
पण तो प्रत्यक्ष कार्यवाहीत येण्यापूर्वीच एक अलौकिक घटना घडली सोव्हिएत रशियाने ४ ऑक्टोबर १९५७ रोजी Baikonur (आत्ताचे कझाकीस्थान मधील ठिकाण) येथून स्पुटनिक-१ हा पृथ्वीचा पहिला कृत्रिम उपग्रह यशस्वी रीत्या कक्षेत सोडून अवकाशविज्ञानाच्या एका नवीन पर्वास प्रारंभ केला. 

अमेरिकेने आपले वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी लगेच प्रयत्न सुरु केले. अनेक अपयशी अवकाश मोहिमा नंतर दिनांक ३१ जानेवारी १९५८ रोजी अमेरिकेने एक्स्प्‍लोअरर-१ हा आपला पहिला उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत सोडला. त्या उपग्रहामुळे व्हॅन ॲलन प्रारणपट्ट्यांचा (पृथ्वीभोवतील उच्च ऊर्जेच्या कणांनी युक्त असलेल्या व व्हॅन ॲलन यांनी शोधून काढलेल्या भागाचा) शोध लागला.


त्यानंतर मानवी महशक्तींची नजर आकाशात भिरभिरणाऱ्या चंद्राकडे गेली. चंद्र सुद्धा ह्या महासत्तांच्या शीतयुद्धात ओढला गेला.. अनेक अयशस्वी उड्डाणानंतर सोव्हिएत रशियाने दिनांक १३ सप्टेंबर १९५९ (मॉस्को च्या वेळे प्रमाणे, अमेरिकेच्या वेळे प्रमाणे १२ सप्टेंबर १९५९) रोजी घोषणा केली की, त्यांनी ‎Baikonur येथून लुना २ ह्या अंतराळ यान यशस्वी रित्या चंद्रावर उतरवले असून ते चंद्रावर जाणारे पहिले मानव निर्मित यान आहे. 


खरं तर ह्या तीनही घटना अंतराळ व अवकाश ह्यांच्या बाबतीत घडलेल्या मानवी इतिहासातील पहिल्या मानव निर्मित अलौकिक घटना आहेत पण त्या सर्वांच्यात एक साम्य आहे ज्याचा आपल्याला अभिमान अभिमान वाटला पाहिजे .. 

ते म्हणजे ह्या सर्व घटना घडल्या त्या दिवशी तिथी होती .. 
शुक्ल पक्षातील एकादशी 

काय सिद्ध होतं ? ह्या अवकाश मोहिमांच्या यशस्वीते मागे लपलेल्या तिथी मुळे .. 
की भारतीय कलागणणेचा वापर हे दोन महासत्तांनी एकमेकांपासून लपवलेल टॉप सीक्रेट होत ?




Monday, August 19, 2019

उदंड जाहले पाणी ..

||श्रीं||
खर सांगायच तर उजव्या हाताने केलेल्या मदती बाबत डाव्या हाताला सुद्धा कालू देऊ नये असे शास्त्र सांगते. परंतु मी जे सांगतोय ते केवळ आम्ही केलेल्या कर्तव्याची पूर्तता म्हणून सांगत आहे.
आजची तिथली स्थिति व त्याही परिस्थितीत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या ठाणे-मुंबई-पालघर-नवीमुंबई विभागा मार्फतच नाही तर महाराष्ट्र व महाराष्ट्रा बाहेरून सुद्धा जी काही कर्तव्यपुर्ती विविध मार्गाने पूरग्रस्त भागात पोहचते आहे; त्याचे स्वरूप ज्या विविध सेवाभावी संस्था मदत म्हणून पूरग्रस्त भागात पोहचत आहेत त्यांना ह्या अनुभवाचा उपयोग व्हावा म्हणून हा प्रपंच ..
कराड पासून गाडी पुढे जायला लागताच पुराचे व्रण सहज दिसायला सुरू होतात. जशी-जशी सांगली जवळ यायला लागते तशी हवेतील दुर्गंधी आपल्याला अस्वस्थ करायला सुरुवात करते. बॅनर-हॉर्डिंग-भिंती यांवरून पुर रेषा कुठवर आली होती ते सहज लक्षात येत होत. वाटेत अवचित पणे नितीन दादा वाटेतच भेटल्याने शोधाशोध न करता ठरलेल्या संकलन केंद्राच्या ठिकाणी आमची गाडी पोहचली. त्यावेळी एका गावासाठी संच (जीवनावश्यक वस्तूंचा सेट) गाडीत भरायचे काम चालू होते. आम्ही सुद्धा दुपारी दोन अडीच वाजता पोहचल्याने तिथल्या कार्यरत धारकऱ्यांनी आम्हां सर्वांनाच हातपाय धुवून पहिले जेवण करून घ्यायचा आग्रह केला. आणि गंमत म्हणजे आम्ही हातपाय धुवून येई पर्यन्त ज्यांच्या दर्शना साठी आम्ही असुसलेलो होतो ते गुरुजीच संकलन केंद्रावर आले. तसे आम्ही जेवणा कडे न वळता गुरुजींच्या दर्शनासाठी धावलो..
बघतो तर गुरुजी भरत असलेल्या गाडी बद्दल चौकशी करत होते. ज्या गावात चाललेय त्या गावाचे नाव सांगताच त्या गावात एवढेच का पाठवताय ? तिथे अधिक संच हवे होते ना ? इत्यादि बाबी गुरुजी विचारत होते. ४०० संच आवश्यक असलेल्या गावात केवळ वाहन व्यवस्था नसल्याने आणलेल्या गाडीत १५० संच भरता येत होते. गुरुजींनी स्वत: सूचना देऊन संच गाडीत आजून व्यवस्थित पणे लावायला लाऊन ५० अधिक संच भरायला लावले. पान गुरुजींच्या डोळ्या समोर उद्विग्नता होती उरलेल्या २०० कुटुंबांबद्दल ..
खरं सांगू का ? खोटे आरोप होवून सुद्धा उद्विग्न न होणाऱ्या गुरुजींना त्यादिवशी आम्ही उद्विग्न बघितले. कारण ? कारण हे तसेच होते .. कारण ४०० हा आकडा छोटा असला तरी तो कुटुंबांचा असल्याने त्याचा व्याप मोठा आहे. किमान १५०० माणसांचा प्रश्न आहे. आणि दिलेला आकडा हा सरकारी अथवा राजकीय नसून प्रत्यक्ष आपल्या धारकऱ्यांनी जाऊन तपासून मग निर्धारित केलेला असल्याने त्यातील तथ्यांश १००% इतका आहे..
प्रत्येक गावासाठी स्थानिक धारकऱ्यांसह एक जवाबदार धारकरी नेमून दिला आहे. गाव मोठ असेल तर आधी धारकरी गावत जाऊन स्वत: तपासणी करून गरजवंत बांधवांची नावे लिहून घेतात व लगेचच त्या संख्ये मधील संच संबंधित गावात पाठवले जातात ..
छोटे गांव/वस्ती असेल तर संचाची गाडी बाहेर ठेऊन आधी जवाबदार व स्थानिक धारकरी वस्तीवर जातात. निरीक्षण करतात.. आणि गरजवंतांना एक टोकन देऊन गाडी जवळ पाठवतात व गाडी जवळ टोकन घेऊन आलेल्या बांधवांचे नाव ब संपर्क क्रमांक टिपून घेऊन संच व इतर साहित्य दिले जात होते.
अनेक वेळेला ग्रामपंचायती कडून "इथे देऊन जा.. आम्ही वाटू .. " म्हणून कडक आग्रह केला जायचा पान गुरुजींनी पाठवलेली शिदोरी आहे हे सांगताच मार्ग मोकळा व्हायचा..
पण ही सर्व नियोजनबद्ध काटेकोर शिस्त लावण्याचे कारण काय ? तर मानवी स्वभाव.
दोष आपल्या मतदारांना / जातभाईंना / कुटुंबीयांना पहिले मदत मिळावी ह्यात नसून सर्वांसाठी आलेली मदत ही केवळ आपल्या मतदारांना / जातभाईंना / कुटुंबीयांनाच मिळावी ह्या अप्पलपोटे पणात आहे.
आणि सर्वात महत्वाचे मला अभिमान आहे आजही अश्या खरंच वंचित व गरजवंता पर्यन्त शासनाच्या मदती आधी धर्म,जाति, पक्ष, पंथ इत्यादि सर्व भेदांना बाजूला ठेऊन केवळ माणूस म्हणून जाणारी पहिली शिदोरी ही "गुरुजींची" आहे ..
नितीनदादा चौगुले, अमितदादा करमुसे ह्यांच्या नेतृत्वाखालील २ केंद्रे बघण्याचा योग आला आणि द्यायला गेलेले हात शिदोरी घेऊन परत आले ..
ह्या शिदोरीसाठी माझ्या ज्या मित्रांनी ह्यात मनापासून तन-मन-धनाने सहयोग केला त्या सर्वांचा मी ऋणी आहेच पण ज्यांनी माझी आवश्यकता असताना माझी अनुपस्थिती सहन केली त्या सर्व अशील(मराठीत क्लाइंट), कुटुंबीय व गणेशोत्सव मंडळातील सहकारी ह्यांचे ही ऋण मी मान्य करतो ..
पण लढाई आजून बाकी आहे 

Sunday, February 17, 2019

संपवा समस्त रिपूंना, चिनी पाकिस्तानी ... भाग १ (हिरवा ड्रॅगन)

     
        दरवेळी पाकिस्तानने असे काही केले की, आपण युद्ध करुन त्याला संपवण्याची भाषा करतो व आपली राष्ट्रभक्ती दाखवतो ! भावनिकतेने बघितल्यास ते योग्यच आहे पण वस्तुस्थिती तशी नाही .... 

               जाहीर युद्धाने पाकला संपवणे ही तिसऱ्या महायुद्धाची नांदी    

               आज आपण संयुक्त राष्ट्र संघाचे जवाबदार सदस्य असल्याने आपण जाहीर युद्धाने पाकिस्तानशी लढू शकत नाही. आपणच काय ? पण अमेरिके सारखे सामर्थ्यामुळे कोणालाही जवाब देण्यास बांधील नाही अश्या समजुतीत असलेले बेजवाबदार राष्ट्र सुद्धा एखाद्या राष्ट्रा विरोधात युद्ध करुन त्याचा भौगोलिक भाग आपल्या राष्ट्राचा भाग करु शकत नाही. ही आजची वस्तुस्थिती आहे... 

              आणि तसे करणे म्हणजे तिसऱ्या महायुद्धाची घंटा आहे. कारण झालेले युद्ध हे केवळ पाकिस्तान विरुद्ध हिंदुस्थान असे होणार नाही. चीन विरुद्ध हिंदुस्थान असे होईल. आज भीक घालण्याची ही लायकी नसलेले पाकिस्तान हे केवळ चीनच्या पाठिंब्या मुळेच हिंदुस्थानला डिचवण्याची हिम्मत करत आहे.  आणि केवळ चीनला अद्दल घडावी म्ह्णून हिंदुस्थानला पुढे करुन व्यापारात प्रस्थापित राष्ट्र विरुद्ध पाकिस्तान व चीन असा हा सामना रंगण्याची शक्यता अधिक आहे. 
             
             जर हा प्रश्न काश्मीर पर्यंतच सीमित राहिला तर ...?

            दोन्ही देशांना न परवडणारे युद्ध टाळता येईल.  पाकिस्तान कडे गमावण्या सारखे काही नसल्याने चीन ने टाकलेले तुकडे ही त्यांच्या साठी बोनसच आहेत परंतु, भारता कडून पूर्ण काश्मिर अथवा पाक व चीन व्याप्त काश्मीर आहे तसे राखण्यात यश आले तर त्याचा परिणाम चीनला खूप फायद्याचा आहे. कारण चीन व पाकिस्तानचे संबंध कितीही छान असले व त्यांची सीमा एकमेकांना लागून नाहीत. त्यामुळे ह्या सगळ्या युद्धाचे चीनच्या बाजूने जर काही कारण असेल तर ते तेल आहे. अमेरिकेने पाकिस्तानचे लाड करणे कमी केल्याने आता त्यांना चीनला आपले बाप बनवण्या शिवाय गत्यंतर नाही. हे पुढील चित्रांतून स्पष्ट होईल. 



ह्या चित्रात आपण पुस्तकात काहीही नकाशा बघत असलो तरी वस्तुस्थितीचा अंदाज आपल्याला येऊ शकेल.  पाकिस्तानला चीनशी भौगोलिक दृष्ट्या जोडलेले राहण्यासाठी पाकव्याप्त काश्मीर हे एकमेव माध्यम असल्याने तो पट्टा अबाधित राहणे चीनसाठी अत्यंत आवश्यक आहे. कारण चीनचा समुद्र मार्गे होणारा व्यापार व मुख्यत्वे त्याला लागणारी ८०% खनिज तेलाची वाहतूक ही मलाक्काच्या समुद्रधुनीतून होते. तिचे भौगोलिकस्थान आपण पुढील चित्रात पाहू .... 

  
            
           
               भौगोलिक दृष्ट्या हिंदुस्थान कधीही चीनच्या आयातीच्या सर्व नाड्या कधीही आवळू शकतो. त्यामुळे ह्या कोंडीतून सुटण्यासाठी एखादा दुसरा मार्ग असणे चीनच्या भवितव्यासाठी आवश्यक आहे .... आणि त्याचाच परिपाक म्हणजे China Pakistan Economic Corridor (C-PEC) ला ’सीपेक’ या संक्षिप्त नांवाने ओळखले जाते. तो चीन मधील काशगर येथून सुरु होतो, तो थेट पाक व्याप्त काश्मीर मधून ३००० किलोमीटरचा प्रवास करीत पाकिस्तानच्या बलुचिस्तान मधील ग्वादर या बंदरात जाऊन पोहोचतो. तो असा.... 


 त्यामुळे हा दिसत हिरवा असलेला साप आपण गेल्या ७० वर्षांत हरवलेला साप नसून आता तो  ड्रॅगन झालाय...

त्याच्या महत्वाकांक्षा  ड्रॅगनच्या असल्या तरी त्या साध्य करण्याची ताकद आजही त्याच्या हिरव्या रंगात आहे.
कशी ते पुढच्या भागात .... 

Wednesday, January 23, 2019

म्हणून आम्ही शिवसैनिक !

         हिंदूहृदय सम्राट, शिवसेना प्रमुख, इत्यादी अनेक उपाध्या आज पर्यंत बाळासाहेब ह्या नावाची शोभा वाढवत दरारा निर्माण करत राहिल्या ...
         पण त्यांचे कर्तुत्व ह्या सगळ्या उपाध्यांपेक्षा मोठ्ठ होत ... 
         खरं म्हणजे ते आमच्या सारख्या जन्मजात शिवसैनिकांच्या लक्षात आले नव्हते ... 
पण एकदा आमचे भाग्य उजळले; पु.श्री. संभाजीराव भिडे गुरुजी घरी आले आणि बोलता बोलता घरातील बाळासाहेबांच्या प्रतिमेकडे बोट दाखवून बोलले.... 
        "ह्या महापुरुषाने श्री शिवछत्रपतींच्या दोनपताकांच्या भगव्या ध्वजाला; १८१८ नंतर पुन्हा एकदा राजकीय सामर्थ्य व प्रतिष्ठा आपल्या कार्य कर्तुत्वाने प्राप्त करुन दिली ..."
          खरं सांगा, ह्या आधी हा असा विचार कोणी केला होता ?
१८१८ ला मराठ्यांचे साम्राज्य बुडाले, भगवा ध्वज उतरला, ब्रिटीशांचा झेंडा फडकला ... 
१४ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले पण तेंव्हा व त्यानंतर कधीही भगव्या ध्वजाला ती अस्मिता, ती प्रतिष्ठा पुन्हा मिळाली नाही ...  
         ती प्रतिष्ठा ह्या महापुरुषाने मिळवून दिली ... 
         खोटं वाटतय .... 
          
          "शिवसेना" ह्या पक्षाशिवाय कुठल्याही पक्षाचा विजय झाल्यावर "भगवा फडकला" असे म्हंटले गेले का ?
त्या आधीचा प्रत्येक विजय हा कुठल्या तरी पक्षाचा होता ... 
सेनेचा विजय हा "भगव्याचा" होता ....
पक्षाचे नेतृत्व बदलेल, कार्यपद्धत बदलेल पण शिवसैनिकांची भगव्या प्रतीची निष्ठा व देव-देश-धर्मापायी काहीही करण्याची वृत्ती सदैव वज्रप्राय असेल ...  
       
          कारण, आम्ही खरंच भाग्यवान आहोत ...
          ह्या डोळ्यांनी बाळासाहेबांसारखे तेजस्वी व्यक्तिमत्व आम्ही पाहू शकलो; अनुभवू शकलो ... 
          आणि पु.श्री. संभाजीराव भिडे गुरुजीं सारखा श्री शिवछत्रपतींचा दृष्टीकोन असलेला द्रष्टा-लोकोत्तर गुरु व मार्गदर्शक ...